शिरगाव हायस्कूलच्या SSC बॅचच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा

Edited by: नागेश दुखंडे
Published on: June 02, 2025 11:58 AM
views 269  views

देवगड : देवगड तालुक्यातील शिरगाव येथील शिरगाव हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाच्या १९९८-९९ च्या एस.एस.सी. बॅचचे माजी विद्यार्थीचा स्नेहमेळावा आयोजित करण्यात आला होता. या निमित्त जुन्या आठवणींना उजाळा यावेळी देण्यात आला.

देवगड तालुक्यातील शिरगाव, शिरगाव हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाच्या १९९८-९९ च्या एस.एस.सी. बॅचचे माजी विद्यार्थी तब्बल २५ वर्षांनंतर पुन्हा एकत्र आले.जुन्या आठवणींना उजाळा देताना डोळ्यांतून ओघळणारे आनंदाश्रू, शाळेच्या प्रगतीसाठी दिलेला मदतीचा हात आणि भावनांनी भरलेला प्रत्येक क्षण या स्नेहमेळाव्याने शिरगाव परिसराला एक वेगळीच उर्जा दिली.कार्यक्रमाची सुरुवात संस्थेचे संस्थापक अध्यक्ष  पुंडलिक अंबाजी कर्ले यांच्या पवित्र स्मृतींना अभिवादन करत, त्यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. या प्रसंगी संस्थेचे उपाध्यक्ष संभाजी साटम,शाळा समिती अध्यक्ष विजयकुमार कदम, मानद अधीक्षक संदीप साटम, मुंबई कार्यकारिणी सदस्य हेमंत देसाई, सदस्य राजेंद्र शेट्ये, व मुख्याध्यापक एस.एन. आत्तार यांची उपस्थिती कार्यक्रमास  लाभली.

यावेळी स्नेहमेळाव्याच्या या क्षणांना कदम सरांनी आपल्या खास शैलीत जुन्या दिवसांची आठवण करून दिली.वर्गखोलीतील खोडकर क्षण,शिक्षकांचे प्रेमळ राग, वार्षिक स्नेहसंमेलने – या आठवणींनी उपस्थितांचे मन भरून आले. संदीप साटम व संभाजी साटम यांनीही विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी प्रेरणादायी मार्गदर्शन केले.या स्नेहमेळाव्याला यशस्वी करण्यासाठी चंद्रशेखर तावडे, प्रल्हाद कुबडे, अजित परब, अर्चना देसाई तावडे, सरिता साटम तावडे, सुनील तावडे, चंदन तावडे यांचा विशेष सहभाग होता.

शाळेच्या नूतनीकरणासाठी मदतीचा हात या भावनिक भेटीतून केवळ आठवणीच नव्हे तर शाळेच्या विकासासाठी प्रत्यक्ष मदतही पुढे आली.एकत्र आलेल्या १६ माजी विद्यार्थ्यांनी शाळेच्या इमारतीच्या नूतनीकरणासाठी १,५१,१०१रुपये देणगी देण्याचा निर्णय घेतला. ही देणगी केवळ आर्थिक मदत नाही, तर शाळेबद्दल असलेल्या ऋणानुबंधांची प्रचिती देणारा एक विलक्षण भावनिक क्षण होता.

शाळेची माती अजूनही हृदयात जिवंत…

या भेटीने हे सिद्ध केलं की, काळ कितीही पुढे गेला, आयुष्यात कितीही प्रगती झाली, तरी शाळेच्या मातीचा सुगंध मनात तसाच राहतो. २५ वर्षांपूर्वी एकाच बाकावर बसलेली ती १६ मनं आज वेगवेगळ्या वाटांवर असली, तरी त्यांची नाळ अजूनही शाळेशी घट्ट जोडलेली आहे. हा स्नेहमेळावा म्हणजे केवळ एक कार्यक्रम नव्हे, तर शाळेशी असलेल्या नात्याची भावनिक पुनर्मिलनाची सोहळा होता. शाळेच्या इतिहासात हे एक सुवर्णपान म्हणून सदैव जपलं जाईल यात तिळमात्र ही शंका नाही.