सावंतवाडी : अर्बन बँकेची परिस्थिती सुव्यवस्थित आहे. सावंतवाडी अर्बन बँक ठेवीदारांच्या ठेवी देण्यास कटीबद्ध आहे .अर्बन बँकेत ठेवलेल्या प्रत्येक ठेवीदारांच्या ठेवी परत देण्यात येतील. याबाबत ठेवीदारांनी मनात कोणतीही शंका बाळगू नये असा विश्वास सावंतवाडी अर्बन बँकेच्या संचालक मंडळाने सोमवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत व्यक्त केला. अर्बन बँकेचे अध्यक्ष अँड.सुभाष पणदुरकर यांच्या उपस्थितीत ही पत्रकार परिषद घेतली गेली.
यावेळी उपाध्यक्ष तानाजी वाडकर संचालक उमाकांत वारंग , मृणालिनी कशाळीकर ,नरेंद्र देशपांडे, रमेश पै, बँकेचे व्यवस्थापक दिनेश पास्ते उपस्थित होते. दरम्यान भारतीय रिझर्व बँकेने सावंतवाडी अर्बन बँकेकडे भाग भांडवलाचे पर्याप्त साधन नसल्यामुळे बँकिंग रेगुलेशन अॅक्ट 35 अन्वये जून महिन्यात निर्बंध लादले होते. वास्तविक सावंतवाडी अर्बन बँकेचा एनपीए शुन्य टक्के आहे .बँकेत कोणताही भ्रष्टाचार झालेला नाही असे असताना सीआरएआर (भाग भांडवल पर्याप्त साधन )नऊ टक्के ऐवजी मायनस 4.25 टक्के असल्यामुळे रिझर्व बँकेने निर्बंध लागू केले . सावंतवाडी अर्बन बँकेच्या सध्याच्या शेअर्स होल्डरकडून साडेतीन कोटी भाग भांडवल आता गोळा झाल्यास उद्याही भारतीय रिझर्व बँक निर्बंध उठवू शकते. त्यादृष्टीने संचालक मंडळाने शेअर्स होल्डरकडून भाग भांडवल गोळा करण्यास सुरुवात केली आहे. बँकेचे बारा हजार पाचशे सभासद आहेत .त्यांच्याकडून हे भाग भांडवल गोळा करण्यात येणार आहे आगामी तीन महिन्यात साडेतीन कोटी रुपये भाग भांडवल गोळा करून बँकेवर लादण्यात आलेले निर्बंध उठवण्यासाठी संचालक मंडळ पुरेपूर प्रयत्न करणार आहे असं अँड सुभाष पणदुरकर म्हणाले.