
सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्हा वीज ग्राहक संघटनेच्या वतीने कुडाळ येथे वीज ग्राहकांचा जनता दरबार आयोजित करण्यात आला होता. या जनता दरबारासाठी महाराष्ट्र वीज ग्राहक संघटना अध्यक्ष प्रताप होगाडे हे खास उपस्थित होते. यावेळी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या वीज ग्राहकांनी महावितरणच्या विरोधात तक्रारींचा अक्षरशः वर्षाव केला. वीज ग्राहकांच्या तक्रारींचे प्रताप होगाडे यांनी संकलन करून वीज ग्राहकांना योग्य असे मार्गदर्शन केले.
यावेळी व्यासपीठावर वीज ग्राहक संघटना जिल्हाध्यक्ष श्रीराम शिरसाट, व्यापारी महासंघ जिल्हाध्यक्ष प्रसाद पारकर, कार्यवाह नितीन वाळके, वीज ग्राहक संघटना जिल्हा समन्वयक ॲड.नंदन वेंगुर्लेकर आदी मान्यवर उपस्थित होते. जिल्हाध्यक्ष श्रीराम शिरसाट यांनी जनता दरबारासाठी उपस्थित असलेल्या महाराष्ट्र वीज ग्राहक संघटनेचे अध्यक्ष प्रताप होगाडे यांचे पुष्पगुच्छ देत स्वागत केले.
गेली काही वर्षे सिंधुदुर्ग जिल्ह्याची वीज वितरण व्यवस्था अक्षरशः मोडकळीस आलेली असून गेली कित्येक दशके वीज वितरणकडून जुनाट वीज वाहिन्या, शेवटच्या घटका मोजत असलेले ट्रान्सफॉर्मर आणि मोडकळीस आलेले विजेचे खांब यांच्या आधारावरच वीज वितरण व्यवस्था सुरू आहे. त्यामुळे एका एका दिवसात जवळपास दहा वेळा वीज खंडित होण्याचे प्रकार जिल्ह्यातील प्रमुख शहरांमध्ये घडत असून महिन्यातील कमीत कमी पंधरा दिवस गावांमध्ये विजेचा पत्ता नसतो. त्यामुळे संतप्त झालेल्या जिल्ह्यातील वीज ग्राहकांनी जनता दरबारात अक्षरशः तक्रारींचा वर्षाव केला. माणगाव येथील सेलेस्तिन शिरोडकर यांनी गोवा राज्यातील वीज ग्राहकांना महाराष्ट्रातून विकत घेतलेली वीज सुद्धा कमी दराने दिली जाते. परंतु महाराष्ट्रात तोच दर शंभर ते दीडशे पट जास्त आहे. वीज चोरी होत असतानाही वीज गळती हा गोंडस शब्द वापरून वीज गळतीचा अधिभार ग्राहकांच्या माथी मारून ग्राहकांना भरमसाठ वीज बिले भरण्यास भाग पाडले जात आहे अशी तक्रार केली. तर गेली जवळपास ४० वर्षे पूर्वीचे वीज खांब अनेक ठिकाणी गंजलेल्या व मोडून पडण्याच्या अवस्थेत आहेत. त्याचे महावितरण कडून ऑडिट का केले जात नाही? कॉन्ट्रॅक्टरकडून करून घेतली जाणारी कामे ही भरमसाठ दर आकारून अधिकारी मॅनेज करतात अशा प्रकारची तक्रार श्रीनिवास करंदीकर यांनी मांडली.
जिल्ह्यातील सर्व सबस्टेशनचा रिव्ह्यू घेऊन किती दिवस व किती वेळ वीज पुरवठा सुरू होता व किती वेळ बंद होता ? याची माहिती माहितीच्या अधिकाऱ्यात घ्यावी अशी सूचना रोनापाल येथील सुरेश गावडे यांनी केली. तळवडे येथे छोटे-मोठे काजू व कात कारखाने आहेत परंतु वीज जोडणी देण्यासाठी "सप्लाय नाही" असे सांगून अधिकारी टाळाटाळ करतात ग्रामपंचायत जागा देण्यास तयार असतानाही सबस्टेशन करण्याची मानसिकता महावितरणच्या अधिकाऱ्यांची नाही अशी नारायण जाधव यांनी खंत व्यक्त केली. वीज खंडित झाल्यावर अधिकाऱ्यांना विचारणा केली असता खारेपाटण येथून डायरेक्ट वीजपुरवठा खंडित झाल्याचे सराईत उत्तर नेहमीच दिले जाते. शेतीपंपाची वीज बिले मार्च एप्रिल मध्ये शेतकऱ्यांच्या कामाच्या वेळीच काढली जातात व बीज बिल न भरल्यास वीज कट करण्याची धमकी दिली जाते. शेतकऱ्यांचे शेतीपंपाचे वीज बिल माफ झाले आहे हे खरे का ? असा प्रश्न शिवराम आरोलकर वेंगुर्ला यांनी केला. शॉर्टसर्किटमुळे झालेली काजू बागेची नुकसान भरपाई वर्ष उलटले तरी दिली नाही अशी तक्रार पांडुरंग दळवी, आंब्रड यांनी केली तर आंब्रड येथीलच केशव मुंज यांनी कसाल ते सोनवणे हा ३६ किलोमीटरचा फिडर असून सोनवडे येथे जरी कुठला फॉल्ट झाला तर ३६ किलोमीटर एरियातील संपूर्ण वीज खंडित होते. यासाठी योग्य ती उपाययोजना करावी असे सांगून "वीज ग्राहक संघटना करत असलेले कार्य नक्कीच कौतुकास्पद आहे" असे म्हणत संघटनेच्या कार्याचे कौतुक केले. वेंगुर्ले तालुकाध्यक्ष संजय गावडे यांनी कुडाळ ते वेंगुर्ला व इन्सुली मळेवाड वेंगुर्ला असा ३३ केव्ही लाईन वरून वेंगुर्ला येथे होणारा वीज पुरवठा जंगलमय भागातून गेल्याने वारंवार वीज पुरवठा खंडित होतो. त्यामुळे सदरची लाईन अंडरग्राउंड करून मिळावी अशी मागणी केली. जिल्हा समन्वयक राजेश राजाध्यक्ष यांनी जिल्ह्यात पिआरओ ऑफिस नाही का? असा प्रश्न उपस्थित करत तक्रार निवारण कक्ष जिल्ह्यासाठी उपलब्ध करून द्यावा असे सांगितले.
जिल्ह्यात हजारो मीटर बंद असून महावितरण त्याची दखल न घेता सरासरी वीज देत जिल्ह्यातील वीज ग्राहकांची लूट करत असल्याची तक्रार गणेश उर्फ बाळ बोर्डेकर यांनी मांडली. ॲड.नंदन वेंगुर्लेकर यांनी दोडामार्ग येथे तीन प्रकल्प वीज निर्मिती प्रकल्प असूनही त्या प्रकल्पामधून निर्मित होणारी वीज गोवा कर्नाटक राज्यांना दिली जाते परंतु सिंधुदुर्ग जिल्ह्याला मिळत नाही, ती जिल्ह्याला मिळावी अशी मागणी केली तर मंदार शिरसाट यांनी वीज वितरणच्या अधिकाऱ्यांनी भाषा सुधारावी व ग्राहकांना योग्य शब्दात उत्तरे द्यावी, असे सुचविले. सावंतवाडी तालुकाध्यक्ष संजय लाड यांनी "महावितरणकडे अपुरे कर्मचारी असूनही निदान १५ दिवस तरी ग्राहकांना वीज पुरवठा होतो हे अभिमानास्पद आहे" अशी मिश्किल टिप्पणी करत महावितरण व्यवस्थेची खिल्ली उडविली. यावेळी देवगड तालुका अध्यक्ष दिनेश पटेल, नंदकिशोर खरावडे, चंद्रकांत म्हापणकर, विठ्ठल दळवी, आदी अनेक वीज ग्राहकांनी होगाडे यांच्यासमोर आपले गाऱ्हाणे मांडले.
महाराष्ट्र वीज ग्राहक संघटनेचे अध्यक्ष श्री.होगाडे यांनी वीज ग्राहकांच्या विविध प्रश्नांची मुद्देसूद उत्तरे देत मार्गदर्शन केले.महाराष्ट्रात विविध खाजगी कंपनीकडून प्रीपेड मीटर लावण्याची मंजुरी सरकारने दिली असून तशा प्रकारचा सर्वे अदानी कंपनीकडून सुरू असल्याबाबत ग्राहकांनी माहिती दिली व प्रीपेड मीटर लावणार नाहीत अशा बातम्या पेपर मध्ये येतात हे खरे आहे का? असा प्रश्न उपस्थित केल्यानंतर प्रताप होगाडे यांनी प्रीपेड मीटर लावणार नाहीत असा कोणताही निर्णय सरकारकडून घेण्यात आलेला नसून भविष्यात येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अशी खोटी अफवा किंवा विधाने काही जणांकडून केली जात आहेत, परंतु "ग्राहकांचा विश्वास संपादन करून प्रीपेड मीटर बसविले जातील" अशा प्रकारचे वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी केले होते हे बरोबर आहे, असे सांगितले त्यामुळे वीज ग्राहकांनी आपल्या विज बिलची झेरॉक्स प्रत जोडून "प्रीपेड मीटर बसविण्यात येऊ नये" असे दोन ओळींचे पत्र संबंधित उपकार्यकारी अधिकारी अथवा सहाय्यक अभियंता यांच्या ऑफिसमध्ये देत प्रीपेड वीज मीटरला विरोध करा, असे त्यांनी आवर्जून सांगितले. उपस्थित ग्राहकांना त्यांनी स्मार्ट मीटर नाकारणे बाबतच्या अर्जाचे वितरण सुद्धा केले. आपल्या घरात कोणता मीटर पाहिजे हे ठरविण्याचा अधिकार कंपनीला नाही तो अधिकार ग्राहकांचा आहे. त्यामुळे प्रीपेड मीटरला ठामपणे विरोध करा अन्यथा भविष्यात या मीटर साठी बारा हजार रुपये डिपॉझिट तुमच्याच वीज बिलातून प्रत्येक महिन्याला कापले जाईल व तुमचा सध्याचा जो मीटर आहे तो सुद्धा स्मार्ट मीटर आहे, त्याचे डिपॉझिट सुद्धा शून्य होणार. मीटर मोफत बसविणार ही महावितरण कंपनी करत असलेली जाहिरात बोगस आहे. ३०० युनिट पेक्षा कमी वीज आकार असणाऱ्या ग्राहकांना स्मार्ट मीटरची गरज नाही तर सरकारकडून सुरू असलेली स्मार्ट मीटर बसविण्याची तयारी म्हणजे खाजगी करण्याच्या दिशेने असलेली वाटचाल आहे. याचा फायदा अदानीला आणि केवळ ग्राहकांना मनस्ताप होणार, एवढेच नव्हे तर बेरोजगारी वाढणार अनेक वायरमन, कर्मचारी, अधिकारी नोकऱ्या गमावून बसणार, ठेकेदार बेरोजगार होणार त्यामुळे वेळीच स्मार्ट मीटरना विरोध करा असेही त्यांनी सांगितले.