दहीहंडीतील जीवघेणे प्रकार नको : राजू मसुरकर

Edited by: विनायक गांवस
Published on: August 24, 2024 09:07 AM
views 325  views

सावंतवाडी : राज्यामध्ये व जिल्ह्यामध्ये गोकुळाष्टमी निमित्त दहीहंडीचा कार्यक्रम उत्साहात पार पडणार आहे. यासाठी तरुणांना आकर्षित करून दहीहंडी फोडण्यासाठी काही मंडळांकडून तसेच विविध पक्षाच्या राजकीय पक्षाकडून लाखो रुपयाची बक्षीस आहेत.  हिंदू धर्मातील कार्यक्रम अवश्य साजरा करावा. परंतु, उच्च न्यायालयाने घातलेल्या  निर्देशाचे पालन करून दहीहंडी फोडण्यात यावी, बालकांना दिलेली वयोमर्यादा पाळावी असं आवाहन सामाजिक कार्यकर्ते राजू मसुरकर यांनी केले आहे. त्या प्रकारच्या सुचना स्थानिक पोलिस निरीक्षकांकडून संबंधितांना देण्यात यावा अशी मागणी जिल्हा पोलिस अधीक्षकांकडे त्यांनी केली आहे. 

ते म्हणाले,  दहीहंडी फोडताना अपघाती होऊन अपंगत्व येऊ नये किंवा मृत्युमुखी पडू नये याची काळजी सर्व सामाजिक मंडळाकडून घेण्यात यावी.  राजकीय पक्षाकडून आकर्षित करण्यासाठी  लाखो रुपयांची बक्षीस हे लावून दहिहंडी होते. मात्र, यातील जीवघेणे प्रकार थांबले पाहिजेत याची काळजी सर्व पक्षाकडून  तसेच सामाजिक मंडळाकडून घेतली पाहिजे. याबाबतचे निर्देश प्रत्येक तालुक्याच्या पोलीस निरीक्षकां मार्फत सर्व मंडळ व पक्षांना सूचना देण्यात याव्यात. उच्च न्यायालयाने घातलेल्या शर्तीचे पालन करावे तसे न केल्यास गुन्हा दाखल होतो याची कल्पना देण्यात यावी. एखादा कुटुंबातील तरुण व्यक्ती मृत्युमुखी पडल्यास किंवा अपंगत्व आल्यास कुटुंबाची जबाबदारी त्या युवकावरती असते. पुढील आयुष्य कठीण परिस्थितीतून त्या कुटुंबाला जावे लागते. याचे भान ठेवावून आयोजन करावे. हिंदू धर्माचा सण अवश्य आनंदात साजरा करावा. परंतु, कुठल्या व्यक्तीला दहीहंडी फोडण्यासाठी उंचीचा थर ज्यादा लावल्याने जीव घेणे प्रकार असे अपंगत्व कायमस्वरूपी येऊ नये याची काळजी घेण्यात यावी अशी मागणी जीवन रक्षा वैद्यकीय प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजेंद्र मसूरकर यांनी केली आहे. जिल्हा पोलिस अधीक्षकांच लक्ष त्यांनी वेधल आहे.