दोडामार्ग : मणेरी येथे तिलारी नदीपात्रात मृतावस्थेत आढळलेल्या 'त्या' अज्ञात इसमाचा गळा आवळल्याने मृत्यू झाल्याचे शवविच्छेदन अहवालात स्पष्ट झाली आहे. त्यामुळे तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. या व्यक्तीचा खून करून नंतर त्याचा मृतदेह नदीपात्रात टाकला असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला असून अज्ञाताविरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला असल्याची माहिती पोलिस निरीक्षक निसर्ग ओतारी यांनी दिली.
मणेरी येथे तिलारी नदीपात्रात कुजलेल्या अवस्थेत एका अज्ञात इसमाचा मृतदेह शनिवारी आढळून आला होता. काही युवक या ठिकाणी आंघोळीसाठी गेले असता त्यांना कुजलेला वास आला त्यामुळे त्यांनी बारीक निरीक्षण केले असता एक ३० ते ४० वयोगटातील इसमाचा मृतदेह आढळून आला. तो मृतदेह फुगलेल्या अवस्थेत होता. दरम्यान या मृतदेहाच्या अंगावर फक्त अंतर्वस्त्र होते. त्यामुळे त्याची ओळख पटविणे कठीण झाले.
पोलिसांनी पंचनामा करून तो मृतदेह शवविच्छेदनासाठी दवाखान्यात नेला होता. त्या व्यक्तीचा मृत्यू हा गळा आवळल्याने झाला असल्याचे निदान वैद्यकीय अधिकाऱ्यांनी केले असून त्याच्या गळ्यावर तसे व्रण असल्याचेही अहवालात म्हटले आहे. त्यामुळे कोणीतरी अज्ञाताने प्रथम खून करून त्यांनतर पुरावा नष्ट करण्यासाठी तो मृतदेह नदीपात्रात टाकला असावा असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. तसा गुन्हाही पोलीस ठाण्यात अज्ञाताविरोधात दाखल करण्यात आला आहे. दरम्यान आजूबाजूच्या परिसरात कोणी अज्ञात इसम जर बेपत्ता असेल तर पोलीस ठाण्याशी संपर्क साधण्याचे आवाहन पोलीस निरिक्षक निसर्ग ओतारी यांनी केले आहे