भरमसाठ बिलांवरून कॉंग्रेस आक्रमक ; अधिकारीचं नसल्याने निवेदन चिकटवलं भिंतीला

Edited by: कृष्णा ढोलम
Published on: July 07, 2023 17:42 PM
views 194  views

मालवण : वाढीव वीज दरामुळे वीज ग्राहकांना जुलै महिन्यात दुप्पट ते तिप्पट रक्कमेची वीज बिले आल्याने आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. त्यामुळे वीज दर कमी करावे अन्यथा महावितरण कार्यालयावर मोर्चा काढण्यात येईल, असा इशारा युवक काँग्रेसचे मालवण शहराध्यक्ष गणेश पाडगावकर व काँग्रेस कार्यकर्त्यांनी निवेदनातून वीज वितरण विभागाला दिला आहे. दरम्यान, निवेदन देण्यासाठी राष्ट्रीय काँग्रेसचे कार्यकर्ते मालवण वीज वितरण कार्यालयात गेले असता कार्यालयात एकही अधिकारी उपस्थित नसल्याने काँग्रेस कार्यकर्त्यांनी आपले निवेदन अधिकाऱ्यांच्या कक्षाच्या भिंतीला चिकटवून नाराजी व्यक्त केली.


यावेळी राष्ट्रीय काँग्रेसचे प्रांतिक सदस्य साईनाथ चव्हाण, जिल्हा सरचिटणीस अरविंद मोंडकर, तालुकाध्यक्ष मेघनाद धुरी, बाळू अंधारी, शहराध्यक्ष जेम्स फर्नांडिस, युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष गणेश पाडगावकर, देवानंद लुडबे, योगेश्वर कुर्ले, लक्ष्मीकांत परुळेकर, बाबा मेंडीस आदी उपस्थित होते.


यावेळी वीज कार्यालयात एकही अधिकारी उपस्थित नसल्याचे दिसून आले. उपअभियंता गणेश साखरे यांची अन्यत्र बदली झाल्याचे तसेच अभियंता सौ. गिरकर या हजर नसल्याची माहिती यावेळी देण्यात आली. तरी वीज वितरण सारख्या सुविधा पुरविणाऱ्या कार्यालयात अधिकारी उपलब्ध नसल्याबाबत काँग्रेस कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त करत आपले निवेदन अधिकाऱ्यांच्या कक्षाच्या भिंतीवर चिकटवले.


जुलै महिन्यात आलेली वीज बिले ही दुप्पट ते तिप्पट रकमेची असून एप्रिल महिन्यात असलेला युनिट दर व या महिन्यात आलेल्या बिला मधील युनिट दर हा वाढीव असल्याचे दिसून आले आहे, यामुळे ग्राहकांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. ३ ते ४ रुपया पर्यंत युनिट चा दर वाढवला गेला असून यामुळे अनेक ग्राहकांना वाढीव हजारा मध्ये भुर्दंड सोसावा लागत आहे. काहीशा शेकड्यात येणारी बिले ही आता हजारात येऊ लागली आहेत. युनिट मागील वाढलेला हा दर इतर राज्यांच्या मनाने आपल्या राज्यात भरपूर प्रमाणात आहे, असे निवेदनात म्हटले आहे. 


तसेच राज्य सरकारने हा वीजदर वाढवताना स्थानिक वृत्तपत्र अथवा कार्यालयात बोर्ड लावून नागरिकांना पूर्व कल्पना देणे गरजेचे होते. परंतु, तसे न करता ही बिल आल्याने आता ऐन पावसाळ्यात अनेकांची कामे व व्यवसाय ठप्प असल्याने इतकी रक्कम कुठून भरायची हा प्रश्न नागरिकांना पडला आहे. त्यात आता बिल हे हजारात थकीत दिसणार असून ते मुदतीत न भरलं गेल्यास आपल्या कर्मचारी वर्गा कडून मीटर कट करण्यात येत आहेत. मुदती नंतर जरी बिल भरले तरी ते वीज वितरणच्या वेबसाईटवर ऑनलाइन दिसत नाही. त्यामुळे नागरिकांना घाबरून वारंवार वीज कार्यालयात फेऱ्या माराव्या लागत असल्याने नाहक त्रास होत आहे. तसेच तांत्रिक बाबी पाहता वीज वितरण कंपनी ही योग्य सुविधा नागरिकांना देत नसून वाढीव बिलांच्या प्रश्नांची तात्काळ दखल घेऊन युनिट दर कमी करावा, अन्यथा महावितरण कार्यालयावर मोर्चा काढण्यात येईल, असा इशारा गणेश पाडगावकर यांनी निवेदनातून दिला आहे.