तुतारी कविसंमेलनातून 'मराठी'चा शंखनाद..!

मोती तलावाच्या काठी काव्यरसिक झाले शब्दांनी ओलेचिंब..
Edited by: प्रा. रुपेश पाटील
Published on: February 28, 2023 13:32 PM
views 263  views

सावंतवाडी : सोमवारी मराठी भाषा गौरव दिनाच्या निमित्ताने सावंतवाडीच्या सुंदरनगरीत सायंकाळी मोती तलावाच्या काठी कवीवर्य केशवसुत कट्ट्यावर 'तुतारी कविसंमेलन' आयोजित करण्यात आले होते.

कवी संमेलनाच्या अध्यक्षस्थानी कुडाळचे ज्येष्ठ साहित्यिक, नाटककार अनंत वैद्य होते. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून कोकण मराठी साहित्य परिषद सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष  मंगेश मसके, स्वागताध्यक्ष कोमसापचे ज्येष्ठ मार्गदर्शक प्रा.सुभाष गोवेकर, कोमसाप केंद्रीय कार्यकारणी सदस्या साहित्यिका उषा परब, कोमसाप सावंतवाडी तालुकाध्यक्ष ॲड. संतोष सावंत, ज्येष्ठ साहित्यिक डॉ. जी. ए. बुवा, जिल्हा सचिव कवी विठ्ठल कदम, मराठी अध्यापक संघाचे भरत गावडे, मालवणी कवी रुजारियो पिंटो, कुडाळ कोमसाप तालुका अध्यक्षा वृंदा कांबळी आदी मान्यवर उपस्थित होते.

प्रारंभी कवी संमेलनाचे अध्यक्ष अनंत वैद्य यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन व ज्ञानपीठ पुरस्कार विजेते कवी वि. वा. शिरवाडकर (कुसुमाग्रज) यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आले.

यावेळी सावंतवाडी कोमसाप  पदाधिकाऱ्यांच्या हस्ते सर्व मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.


तुतारी काव्य संमेलनाच्या पूर्वार्धात कोमसापने शिवजयंतीनिमित्त आयोजित निबंध स्पर्धेतील विजेत्यांना प्रमाणपत्र व बक्षिसे वितरित करण्यात आली. ही निबंध स्पर्धा पत्रकार अमोल टेंबकर यांनी मातोश्रींच्या स्मरणार्थ प्रायोजित केली होती. 


*कवींनी उधळले काव्यरंग*

सावंतवाडीच्या कविवर्य केशवसुत कट्ट्यावर केशवसुतांच्या 'तुतारी' कवितेची आठवण म्हणून बसविलेल्या तुतारीच्या सानिध्यात संपूर्ण मोकळ्या वातावरणात पहिल्यांदाच अशा प्रकारचे कवी संमेलन कोमसाप सावंतवाडी शाखेने आयोजित केले होते. या कवी संमेलनात जिल्हाभरातील अनेक कवी कवयित्रीनी सहभाग घेतला होता. तसेच मोठ्या प्रमाणावर रसिक श्रोत्यांची गर्दीही पहायला मिळाली.

मालवणचे कवी रुजारियो पिंटो यांच्या ' शालग्या' या मालवणी कवितेने तुतारी कविसंमेलनाची सुरुवात करण्यात आली. जिल्हाभरातून कवी संमेलनासाठी उपस्थित असलेल्या कवी-कवयित्रींनी बहारदार अशा कविता सादर करून काव्य संमेलनात रंगत आणली. तुतारी कवी संमेलनात मुक्तछंदापासून मालवणी, वृत्तबद्ध कवितेपर्यंत विविध प्रकारच्या कविता सादर करण्यात आल्या. "अआइईची कास सोडुनी एबीसीडी लिहिली, मायमराठीच्या पायाची भरणी कच्ची झाली' या कवितेतून कवी दीपक पटेकर यांनी मराठीची व्यथा मांडली. अॅड.नकुल पार्सेकर यांनी 'कविता तारण', प्रा. रुपेश पाटील यांनी खांद्यावर वेगवेगळ्या पक्षांचा झेंडा घेऊन फिरणाऱ्या तरुणाची होणारी अवस्था, त्याच्या मरणानंतर मातेला मिळणारे सरकारचे लाख रुपये काय कामाचे? असे विदारक चित्र दर्शविणारी 'लाख मोलाचा पोरगा' ही कविता सादर करून श्रोत्यांच्या डोळ्यात पाणी आणले. कुडाळच्या अदिती मसुरकर यांची बालकविता, विठ्ठल कदम, कल्पना बांदेकर, मंगल नाईक-जोशी, ऋतुजा सावंत- भोसले, प्रज्ञा मातोंडकर, उषा परब, रवींद्र ओगले, सोमा राऊळ आसोली, रा. भा. खानोलकर, पिंगुळी, वाय. पी. नाईक, मुकुंद पिळणकर, तसेच आयुर्वेदिक कॉलेजचे विद्यार्थी जयराज मरकड, तारामती पद्मपल्ले, वैभव रांजवन यांच्या सामाजिक विषयांवरच्या कविता अनेकांच्या मनाला भावल्या. त्याचप्रमाणे कुडाळ येथून आलेल्या डॉ. मेधा फणसळकर, स्नेहल फणसळकर, सुरेश पवार, वालावलकर, संदेश धुरी, सुधीर धुमे, प्रवीण ठाकूर, यशोधन चव्हाण, रामदास पारकर आदींनी बहारदार काव्यरचना सादर केल्या.


कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कोमसापच्या कार्यकारणी सदस्या मेघना राऊळ यांनी तर तुतारी काव्य संमेलनाचे सूत्रसंचालन कवी विठ्ठल कदम यांनी केले. प्रास्ताविक सावंतवाडी तालुकाध्यक्ष ॲड. संतोष सावंत, स्वागत प्राध्यापक सुभाष गोवेकर यांनी केले. 


*मराठी भाषेला हिंदीचीच सर्वाधिक भीती - अनंत वैद्य*

दरम्यान तुतारी कवी संमेलनाचे अध्यक्ष साहित्यिक अनंत वैद्य यांनी आपल्या मनोगतात मराठी भाषेला इंग्रजी भाषेपेक्षा जास्त जर कोणाची भीती असेल तर ती म्हणजे हिंदी भाषेची असे सांगतानाच आपण मराठी असूनही बाहेर गेल्यानंतर बऱ्याचदा सहजपणे मराठी ऐवजी हिंदी बोलतो, याची काही उदाहरणे देखील दिली. यापुढे प्रत्येक मराठी माणसाने मराठी भाषेला स्वतःहून न्याय द्यायला हवा तरच मराठी भाषा ही संवर्धित होईल असेही आवाहन वैद्य यांनी केले.

यावेळी कोकण मराठी साहित्य परिषदेचे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष मंगेश मसके यांनी कार्यक्रमाला शुभेच्छा देत कोकण मराठी साहित्य परिषद, सावंतवाडी शाखा अत्यंत उत्तम प्रकारे साहित्य सेवा करत असल्याचा दाखला दिला. केंद्रीय कार्यकारणी सदस्या उषा परब यांनी देखील आपल्या मनोगतात तुतारी कवी संमेलनाला शुभेच्छा दिल्या. कवी संमेलनाचे आभार प्रदर्शन कवी दीपक पटेकर यांनी केले.

 काव्य संमेलनाला सावंतवाडीसह जिल्हाभरातील अनेक रसिक श्रोते, साहित्यिक उपस्थित होते. त्यात डॉ. मधुकर घारपुरे, श्री. प्रभू, माजी नगरसेवक संजय पेडणेकर, सामाजिक बांधिलकीचे रवी जाधव, नंदकुमार गावडे, कोमसाप माजी जिल्हाध्यक्ष अॅड. अरुण पणदूरकर, कोमसाप सावंतवाडी तालुका उपाध्यक्ष व ज्येष्ठ पत्रकार अभिमन्यू लोंढे, खजिनदार डॉ. दीपक तुपकर, सहसचिव राजू तावडे, पत्रकार व सदस्य विनायक गावस, धोंडी मसूरकर, अदिती सामंत, श्री कासले, रत्नाकर कोळंबकर, कोमसाप सावंतवाडी, कुडाळ, मालवण, आदी शाखांचे सदस्य, पदाधिकारी, प्रिंट आणि सोशल मीडियाचे पत्रकार उपस्थित होते.