LIVE UPDATES

विद्यार्थ्यांनी केवळ गुण नव्हे, तर मूल्यंही जोपासावीत : आमदार शेखर निकम

चिपळुणात राष्ट्रवादीतर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव सोहळा
Edited by: मनोज पवार
Published on: June 27, 2025 19:49 PM
views 36  views

चिपळूण : "गुण हे यशाचं एक पाऊल असतं, पण मूल्यं ही जीवनाची दिशा ठरवतात," अशा शब्दांत आमदार शेखर निकम यांनी गुणवंत विद्यार्थ्यांना सन्मानित करताना त्यांच्या यशाचं कौतुक केलं. राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे आयोजित करण्यात आलेल्या गुणवंत विद्यार्थी गुणगौरव सोहळ्यात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.

कापसाळ येथील माटे सभागृहात पार पडलेल्या या कार्यक्रमात दहावी, बारावी तसेच विविध स्पर्धा परीक्षांमध्ये उल्लेखनीय यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी बोलताना आमदार शेखर निकम म्हणाले, "आजच्या यशाचं श्रेय केवळ गुणांपुरतं मर्यादित नसून त्या मागे असलेली मेहनत, चिकाटी, संस्कार आणि पालक व शिक्षकांचे योगदानही तितकंच मोलाचं आहे."

ते पुढे म्हणाले, "परीक्षेत मिळालेले गुण हे अंतिम ध्येय नसावं. खरे ध्येय असावं चांगला नागरिक होण्याचं, समाजाचं ऋण फेडण्याचं आणि देशाच्या प्रगतीत सहभागी होण्याचं. जीवनात अनेक संकटं, स्पर्धा आणि अपयशं येतील, पण त्या वेळी तुमचं मनोधैर्य, मूल्यं आणि विचारशक्तीच उपयोगी ठरतील." विद्यार्थ्यांनी फक्त गुण मिळवण्यापलीकडे जाऊन विचारांची स्पष्टता, सामाजिक भान आणि आत्मसन्मान जपण्याचं आवाहनही त्यांनी यावेळी केलं.

कार्यक्रमात प्रांताधिकारी आकाश लिगाडे यांनी स्पर्धा परीक्षा, मेहनतीचे महत्त्व आणि योजनाबद्ध अभ्यास याबाबत मार्गदर्शन केलं. ज्येष्ठ पत्रकार सतीश कदम यांनी मोबाईल व सोशल मीडियाच्या अतिरेकावर भाष्य करत विद्यार्थ्यांना तंत्रज्ञानाच्या योग्य वापराबाबत जागरूक राहण्याचा सल्ला दिला.

या वेळी पदवी प्राप्त केलेल्या डॉ. भक्ती पवार हिचा विशेष सत्कार करण्यात आला. तसेच तालुक्यातील प्रत्येक विद्यालयातून दहावी व बारावीच्या परीक्षेत प्रथम तीन क्रमांक पटकावलेल्या विद्यार्थ्यांनाही मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आलं.

कार्यक्रमास उपविभागीय पोलिस अधिकारी राजेंद्रकुमार राजमाने, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष नितीन ठसाळे, ज्येष्ठ नेते दादा साळवी, माजी सभापती सुरेश खापले, रिया कांबळे, माजी नगराध्यक्ष रिहाना बिजले, माजी जिल्हा परिषद सदस्य अशोक कदम, मीनल काणेकर, माजी उपसभापती सुर्यकांत खेतले, पांडुरंग माळी, शहराध्यक्ष मिलिंद कापडी, युवक तालुकाध्यक्ष नीलेश कदम, किशोर रेडीज, उदय ओतारी, आदीती देशपांडे, मनाली जाधव आदींसह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.