
चिपळूण : कृषीभूषण डॉ. तानाजीराव चोरगे शिक्षण व संशोधन संस्था मांडकी - पालवण अंतर्गत संचालित गोविंदरावजी निकम कृषी महाविद्यालय व जिजामाता महिला कृषी महाविद्यालय मांडकी- पालवण यांच्या संयुक्त विद्यमाने महाविद्यालयात गुरुपौर्णिमा मोठ्या श्रद्धा आणि उत्साहात साजरी केली.
या पवित्र दिवशी आपल्या गुरुंप्रती आदर आणि कृतज्ञता व्यक्त केली जाते. याला 'व्यासपौर्णिमा' असेही म्हटले जाते, कारण याच दिवशी महर्षी वेदव्यास यांचा जन्म झाला असे मानले जाते, ज्यांनी वेदांचे संकलन करून मानवजातीला अमूल्य ज्ञान दिले. गुरु हे अज्ञानाचा अंधार दूर करून ज्ञानाचा प्रकाश पसरवणारे दीपस्तंभ मानले जातात. त्यांच्या मार्गदर्शनामुळेच जीवनाला योग्य दिशा मिळते आणि आपले जीवन घडते. या दिवशी गुरुंचे केवळ पूजनच नव्हे, तर त्यांच्या उपदेशाचे पालन करणेही महत्त्वाचे मानले जाते. गुरुंनी आयुष्यात दिलेल्या शिकवणीचे स्मरण करून त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली जाते. गुरुपौर्णिमा हा केवळ एक सण नसून तो आपल्या संस्कृतीचा, परंपरेचा आणि मूल्यांचा अभिमान आहे. हा दिवस गुरु-शिष्य परंपरेचे महत्त्व अधोरेखित करतो आणि आपल्याला जीवनात योग्य दिशा दाखवणाऱ्या गुरुंना वंदन करण्याची प्रेरणा देतो.
या कार्यक्रमानिमित्त महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी पुढाकार घेत कार्यक्रमाचे आयोजन केले, तसेच उपस्थित सर्व प्राध्यापकांचा सत्कार देखील केला. महाविद्यालयातील विद्यार्थी प्रेम जाधव, कु. आर्या दुर्गुले, कु. नम्रता अहिरे व कु. देवयानी गुरव या विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. तसेच प्राध्यापक प्रथमेश घर्वे, प्राध्यापिका सिद्धी नाईक, जिजामाता महिला कृषी महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. शमिका चोरगे व गोविंदरावजी निकम कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संकेत कदम यांनी देखील गुरुपौर्णिमेनिमित्त आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हे कु. शितल डोहळे व आभार प्रदर्शन कु. गायत्री मांगडे या विद्यार्थिनींनी केले.
या कार्यक्रमासाठी गोविंदरावजी निकम कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संकेत कदम, जिजामाता महिला कृषी महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. शमिका चोरगे, उपप्राचार्य प्राध्यापक बाळासाहेब सूर्यवंशी तसेच सर्व प्राध्यापक व विद्यार्थी या कार्यक्रमासाठी उपस्थित होते.