
दापोली : मच्छीमार सोसायटीच्या तज्ञ संचालक पदासाठी नीलकंठ रघुवीर यांचे नाव सुचविल्याने त्याचा राग येवून वाडीतील मंडळाच्या पदाधिकार्यांनी आपल्याला तसेच अन्य कुटुंबाना २०१५-१६ पासून वाळीत टाकले असल्याची तक्रार पाजपंढरी येथील गोपीचंद रामचंद्र चोगले यांनी दापोली पोलीस ठाण्यात दाखल केली असून संशयीताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत दापोली पोलीस ठाण्यात्तून मिळालेल्या माहितीनुसार पाजपंढरी शेतवाडी येथील गोपीचंद रामचंद्र चोगले यांनी २०१५-२०१६ मध्ये श्रीराम मच्छिमार सहकारी संस्थेच्या तज्ञ संचालक पदासाठी नीलकंठ रघुवीर यांचे नाव सुचविले होते, त्यानुसार रघुवीर यांची नियुक्तीही झाली होती. त्यानंतर झालेल्या वाडीच्या बैठकीत गणेश जनार्दन चोगले व अन्य लोकांनी तू रघुवीर यांचे नाव का सुचविलेस, तू वाडीतील अन्य लोकांचा विचार न घेता नाव सुचवून वाडीचा गुन्हा केला असून तू ज्या संस्थेवर संचालक आहेस त्या पदाचा राजीनामा दे असे मला सांगितले, त्यानुसार आपण राजीनामा दिला मात्र संस्थेच्या संचालक मंडळाने तो स्वीकारला नाही म्हणून आपण त्या संस्थेच्या कामकाजात पुन्हा सहभागी झालो. त्यानंतर वाडीच्या बैठकीला आपण गेलो नाही मात्र मला वाडीबाहेर काढले असल्याची माहिती भाऊ विनोद चोगले यांनी दिली. त्यानंतर ८ एप्रिल २०२५ रोजी रात्री ८ वाजता झालेल्या वाडीच्या तातडीच्या बैठकीत माझ्या कुटुंबाला तुमच्या भावाला वाडीतून बाहेर काढले आहे तुम्हाला तुमचा भाऊ पाहिजे कि वाडी पाहिजे अशी विचारणा केली असता नरेश चोगले यांनी मला भाऊ पाहिजे असे संगितले तर चुलत भाऊ प्रकाश चोगले यांनी वाडी पाहिजे असे सांगितले. तसेच पाजपंढरी येथे रामनवमीची पालखी मिरवणुक सुरु असताना तुम्हाला वाडीतून बाहेर काढलेले आहे. म्हणून तू मंडळाच्या मिरवणुकित उभा राहू नको असे सांगून आपल्याला मिरवणुकीतून बाहेर काढण्यात आल्याची तक्रार गोपीचंद रामचंद्र चोगले यांनी दापोली पोलीस ठाण्यात दिली असून त्यांनी या तक्रारीत गणेश जनार्दन चोगले, महेश महादेव तबीब, विष्णू बाळ्या तबीब, ब्रम्हानंद पोशिराम कुरुळकर, अनिल गोपाळ चोगले, बाळकृष्ण नागू रघुवीर सर्व रा. पाजपंढरी, शेतवाडी या संशयितांची नावे दिली असून त्यांचावर सामाजिक बहिष्कार प्रतिबंध (प्रतिबंध निवारण) अधिनियम २०१६ चे कलम ५ व ६ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास उपनिरीक्षक डी.डी.पवार करत आहेत.