तिलारी धरणग्रस्तांचा रिंग रोड करा

कार्यकारी अभियंता विनायक जाधव यांच्याकडे मागणी
Edited by: लवू परब
Published on: May 30, 2025 16:54 PM
views 96  views

दोडामार्ग : तालुक्यातील तिलारी आंतर राज्य प्रकल्पाच्या बुडीत क्षेत्रातील वरच्या क्षेत्रात जाण्यासाठी धरणग्रस्त शेतकरी यांना धरणाच्या जलाशयाचा बाजूने काढण्यात येणाऱ्या रिंग रोडला धरणग्रस्त शेतकरी वर्गातून तीव्र विरोध केला आहे आज बुडीत क्षेत्रातील रिंग रोड बाधीत शेतकरी यांची बैठक सरगवे पुनर्वसन गावच्या ग्रामपंचायत येथे कार्यकारी अभियंता विनायक जाधव यांच्या उपस्थितीत घेण्यात आली. 

यावेळी बैठकीला सरगवे, आयनोडे पाल, पाट्ये, शिंरगे केंद्रे आदी गावचे ग्रामस्थ उपस्थित होते. मात्र रिंग रोड झाला पाहिजे मात्र भूसंपादन करण्यात यावे. तसेच नुकसान भरपाई देण्यात यावी यासाठी शासन स्तरावर पाठपुरावा करण्यात यावा अशी मागणी करण्यात आली आहे.

यापूर्वी शिंरगे, आयनोडे गावच्या हद्दीत रस्ता काम करण्यात आले याचे रक्कम देण्यात आली. मात्र शिंरगे गावचे धरणग्रस्तांचे मोठे नुकसान झाले आहे. वीस गुंठे जागेबाबत संमती देण्यात आली असताना शंभर गुंठे जागेबाबत संमती दिली असल्याचे स्पष्ट झाले असून यांची चौकशी झाली पाहिजे.       

तसेच जो पर्यंत शिंरगे गावातील धरणग्रस्तांना बागायती जमीन घरे झाडांची रक्कम मिळत नाही तोपर्यंत आमचा रिंग रोडला विरोध असल्याचे श्री गवस यांनी स्पष्ट केले. तर पांट्ये गावातील शेतकरी धरणग्रस्त यांना नुकसान भरपाई मिळत नाही तोपर्यंत विरोध केला जाणार आहे.

मायकल लोबो म्हणाले की, आयनोडे गावच्या हद्दीत रस्ता करताना कोणती परवानगी घेतली होती. वन विभागाच्या जागेबाबत संमती मिळाली आहे का आदी प्रश्न उपस्थित केले. तसेच जो पर्यत भूसंपादन केले जात नाही व मोबदला मिळत नाही तोपर्यंत विरोध करण्यात येणार असल्याचे सांगितले. 

काही धरणग्रस्त यांनी रिंग रोड झाला पाहिजे पण भूसंपादन करण्यात यावे. तसेच नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी केली आहे. यावेळी लक्ष्मण गवस, संजय सावंत, शंकर देसाई, संजय नाईक, सदानंद सावंत, बाळकृष्ण गवस, उल्हास गवस, भिवा गवस, सुहास देसाई, झरे उपसरपंच आयनोडकर, अंकुश गवस आदी उपस्थित होते.