
सावंतवाडी : सोनुर्ली व न्हावेली येथील बीएसएनएल मोबाईल टॉवर गेल्या पाच दिवसापासून बंद आहे. हा मोबाईल टॉवर तात्काळ सुरू करा, अशी मागणी सोनुर्ली उपसरपंच भरत गावकर यांच्यासह ग्रामस्थांच्या शिष्टमंडळाने केली. दरम्यान, केबल तुटल्याने हा प्रॉब्लेम उद्धवला असून उद्या संबंधित यंत्रणा प्रॉब्लेम दूर करुन टॉवर पुनश्च कार्यान्वीत करणार असल्याचे आश्वासन बीएसएनएलच्या अधिकाऱ्याने दिले.
वारंवार केबल तुटण्याचे प्रकार आणि लाईट गेल्यावर नेटवर्क जाण्याचा प्रकार होत असल्याने यावर उपाययोजना राबवा असे मागणी ही यावेळी उपस्थितांनी केली. बीएसएनएलचे मोबाईल टावर बंद असल्याने सोनुर्ली आणि न्हावेली हे दोन्ही गाव गेले पाच दिवस नाॅट रिचेबल आहेत. याबाबत अधिकाऱ्यांचे लक्ष वेधूनही टॉवर सुरु करण्याबाबत काहीच हालचाली होत नसल्याने संतप्त ग्रामस्थासह उपसरपंच श्री .गावकर यांनी सावंतवाडी येथील बीएसएनएल कार्यालयात धडक देत अधिकार्यांना धारेवर धरले. गेले पाच दिवस नेटवर्क अभावी गावात समस्या निर्माण झाल्या आहेत. नोकरी व्यवसाय करणारे तसेच शालेय विद्यार्थांना याचा फटका सहन करावा लागत आहे. सोनुर्ली गाव श्रीदेवी माऊली देवस्थानामुळे संपूर्ण जिल्ह्यात व महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. या ठिकाणी दररोज मोठ्या संख्येने भाविक भक्त आणि पर्यटक दाखल होत असतात बऱ्याचदा गावात मोबाईल नेटवर्क नसल्याने पर्यटक तसेच भाविक भक्तांचा हिरमोड होतो.त्यामुळे तात्काळ नेटवर्क सुरु करण्यात यावे अशी मागणी उपसरपंच गावकर यांनी केली. तर सोनुर्ली गावातील काही वाड्या या न्हावेली टाॅवरच्या क्षेत्रात येतात त्यामुळे दोन्ही टाॅवर तात्काळ सुरु होणे गरजेचे असल्याचे ते म्हणाले.
यावेळी ऑप्टिकल केबल तुटल्याने गेले पाच दिवस मोबाईल टॉवर बंद आहेत सदर नियंत्रणेकडून उद्या गुरुवारी हे काम मार्गी लावण्यात येणार आहे. त्यामुळे उद्यापासून दोन्ही टाॅवर कार्यान्वित होणार आहेत. मॅनपावर कमी असल्याने वेळेत कामे होत नाहीत. परंतु ग्रामस्थांची गैरसोय लक्षात घेता प्राधान्याने उद्या दोन्ही टावर कार्यान्वित करू असे आश्वासन अधिकाऱ्यांकडून देण्यात आले. दरम्यान सोनुर्ली येथील मोबाईल टॉवरला बॅटरी बॅकअप नसल्याने लाईट गेल्यावर टॉवर बंद पडतो त्यासाठी सोलर लाईट सिस्टीम अन्यथा अन्य पर्यायी मार्ग उपलब्ध करून द्या अशी मागणी ही उपस्थित त्यांनी केली यावेळी सदरचा टॉवर फोजी सेवेमध्ये घेण्यात येणार आहे तसेच अपग्रेड सिस्टीममध्ये सोलर सिस्टिम चे काम होणार आहे.त्यामुळे हा प्रश्न ही मार्गी लागणार असून त्यासाठी पुनश्च पाठपुरावा केला जाईल असेही अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. यावेळी माजी सरपंच प्रणाली गाड, ग्रामसेवक तन्वी गवस, ग्रामसेवक तथा ग्रामस्थ मुकुंद परब, प्रवीण गाड आधी उपस्थित होते.