
कणकवली : कणकवली तालुक्यातील कुंभवडे टिपरवाडी येथे मल्हार नदीवर असलेल्या साकवाची स्थिती धोकादायक बनली असून कुंभवडे येथील डोंगरदऱ्यातून येणाऱ्या व वेगाने वाहणाऱ्या मल्हार नदीवर असलेला हा साकव टिपरवाडीच्या पलीकडील भागास जोडला जातो. मात्र या साकवावरून सध्या खिरलांचीवाडी येथील जवळपास दहाहून अधिक घरांमधील 40 ते 50 ग्रामस्थांची रहदारी धोकादायक स्थितीतच सुरू आहे. परंतु अद्याप पर्यंत या साकवाच्या धोकादायक स्थितीकडे लक्ष दिलेले नसल्याने या भागातील ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे. पुणे येथे साकव कोसळून जीवितहानी झाल्याची घटना घडल्यानंतर सिंधुदुर्ग जिल्ह्यात काही भागांमध्ये अशा धोकादायक साकवांची स्थिती समोर आली होती. पालकमंत्री नितेश राणे यांनी याबाबत आढावा घेत प्रशासनाला सूचना देखील दिल्या होत्या. त्यामुळे या साकवा संदर्भात देखील प्रशासनाने तातडीने दखल घ्यावी अशी मागणी ग्रामस्थांमधून होत आहे.
खिरलांचीवाडी मध्ये असलेल्या या दहाहून अधिक घरामधील काही विद्यार्थी हे शंकर महादेव विद्यालय कुंभवडे व कुंभवडे प्राथमिक शाळा नंबर 1 मध्ये येतात. दरम्यान या साकवावरील सिमेंट काँक्रीटच्या प्लेट देखील तुटलेल्या स्थितीत आहेत. त्यामुळे चालत जाताना येथून पडून जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे या साकवाची प्रत्यक्ष पाहणी करून त्याची तातडीने दखल घेण्याची मागणी कुंभवडे येथील युवासेना विभाग प्रमुख गुरुनाथ पेडणेकर व ग्रामस्थांमधून केली जात आहे.