रत्नागिरी : गणेशोत्सवात उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना शासनाकडून पुरस्कार देण्यासाठीच्या स्पर्धेकरिता जिल्हाधिकारी यांच्या समन्वयाखाली जिल्हास्तरीय समिती गठीत करण्यात आली. जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह यांनी त्याबाबतचे आदेश काढले आहेत.जिल्हास्तरीय समन्वय समितीच्या अध्यक्ष उपजिल्हाधिकारी (सा.प्र.) शुभांगी साठे असून पाच सदस्य व सदस्य सचिव म्हणून जिल्हा नियोजन अधिकारी असणार आहेत.
तालुकास्तरावरील समन्वय समितीच्या अध्यक्षपदी त्या त्या तालुक्याचे तहसीलदार असणार आहेत. या समित्यांमध्ये ६ सदस्य असून प्रत्येक समितीमध्ये तालुक्यातील नामांकित कलाशिक्षकाला सदस्य म्हणून घेण्यात आले आहे.
तालुकास्तरीय समितीकडून प्राप्त माहितीनुसार जिल्हयातील एक उत्कृष्ट गणेशोत्सव मंडळाची शिफारस करुन त्यांचे नाव सर्व कागदपत्र व्हिडीओसह पु.ल. देशपांडे कला अकादमी, मुंबई यांच्याकडे सादर करण्यात येणार आहे.
जिल्हयातून एक उत्कृष्ट गणेशोत्सव मंडळाची शिफारस राज्य समितीकडे करण्यात येऊन २५ हजार रुपयांचे पारितोषिक व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे. तसेच राज्यस्तरावर प्रथम क्रमांक पटकविणाऱ्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळास ५ लाख, द्वितीय क्रमांकास २ लाख ५० हजार आणि तृतीय क्रमांकास १ लाख रुपयांचे पारितोषिक देण्यात येणार आहे.