माजगावातील घडनेनंतर महावितरणला विचारला जाब

जीर्ण विजेचे पोल त्वरीत बदला : अर्चना घारे-परब
Edited by: विनायक गांवस
Published on: April 15, 2024 09:52 AM
views 147  views

सावंतवाडी : सावंतवाडी तालुक्यातील जीर्ण झालेल्या विद्युत खांबांच तात्काळ सर्वेक्षण करून ते त्वरित बदलण्यात यावे अशी मागणी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या कोकण विभाग महिला अध्यक्षा अर्चना घारे-परब यांनी निवेदनद्वारे केली. महावितरणचे उपकार्यकारी अभियंता कुमार चव्हाण यांची भेट घेत माजगाव येथील घडलेल्या घटनेबाबत त्यांनी जाब विचारला. दैव बलवत्तर म्हणून त्या युवकाचा जीव वाचला, दुर्घटना घडली असती तर जबाबदार कोण राहील असतं ? असा सवाल त्यांनी केला. दरम्यान, तात्काळ सर्वेक्षण करून जीर्ण पोल बदलण्याची मागणी त्यांनी केली.

अर्चना घारे-परब म्हणाल्या, माजगाव येथे चालत्या गाडीवर विजेचा खांब कोसळून युवक जखमी झाला. दैव बलवत्तर म्हणून त्याचा जीव वाचला. आपल्याकडचे पोल हे जीर्ण झाले असून ते बदलले गेले नाहीत. नागरिकांना नाहक त्रास यामुळे सहन करावा लागतो. ओटवणेत मागे एका विद्यार्थ्याचा हकनाक बळी महावितरणच्या दुर्लक्षामुळे गेला. अनेक घटना महावितरणच्या बेजबाबदार पणामुळे घडल्या. त्यामुळे जीर्ण पोलांचा सर्वे करत ऑडीट रिपोर्टची मागणी केली आहे. तसेच लाईनवर आलेल्या झाडांच्या फांद्या हटविण्याची सुचना केली आहे. येत्या आठ दिवसांत कार्यवाहीच आश्वासन उप कार्यकारी अभियंता यांनी दिलं आहे. आठ दिवसांनी आम्ही पुन्हा आढावा घेऊ. तर नागरिकांसह ग्रामस्थांनी आपल्या भागातील जीर्ण पोल, वीजेची लाईन याकडे महावितरणकडे तक्रार करावी असं आवाहन सौ.घारेंनी केलं.

याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला शहराध्यक्ष अँड.सायली दुभाषी, युवती अध्यक्षा सावली पाटकर, तालुका उपाध्यक्ष बाबल्या दुभाषी, शहर उपाध्यक्ष राकेश नेवगी, विद्यार्थी सेल तालुकाध्यक्ष ऋतिक परब, प्रसाद परब, सुधा परब आदींसह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते