आप्पासाहेबांच्या विचारांचं आचरण करावं : नितीन गडकरी

Edited by:
Published on: February 17, 2025 20:03 PM
views 194  views

देवगड : देशाच्या  राजकारणामध्ये  कोकणाचं खूप मोठ योगदान आहे.आप्पा ज्या ज्या वेळी माझ्याकडे आले त्या वेळी या सिंधुदुर्ग जिह्यातील रस्त्यांचे प्रश्न माझ्याकडे घेऊन आले आप्पांनी त्या काळामध्ये अनेक पूल आणि रस्ते बांधून पूर्ण केले. राजकारण केवळ सत्ताकारण नसून समाजकारण आहे. विकास हाच खरा हेतू असायला हवा.गरीबांचे अश्रू पुसणे, शेतकरी आणि शेतमजुरांचे कल्याण करणे, गावात चांगल्या शाळा आणि उत्तम रस्ते उपलब्ध करून देणे, शुद्ध पाणी मिळवून देणे हे प्राथमिक उद्दिष्ट हवे. जाती, धर्म, भाषा याच्या पलिकडे विचार करून समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी काम केले पाहिजे. हा दृष्टिकोन ठेवून आप्पासाहेब गोगटे यांनी काम केले. आप्पासाहेबांसारखे दैव दुर्लभ नेतृत्व अभावानेच जन्माला येते अशा शब्दांत केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी देवगडचे माजी आमदार कै. आप्पासाहेब गोगटे यांचा गौरव केला. आप्पासाहेब गोगटे यांच्या जन्मशताब्दी वर्षाचा समारोप केंद्रीयमंत्री नितीन गडकरी अध्यक्षतेखाली सोमवारी झाला. 

गडकरी म्हणाले, जातपात धर्म विसरून केवळ माणुसकी म्हणून काम करण्याची करण्याचा आप्पासाहेब गोगटे यांचा स्वभाव होता. भगवान श्रीकृष्ण यांनी आपल्या नावामागे कधीही “यादव” लावले नाही, तसेच परशुरामांनी “शर्मा” लावले नाही. त्यामुळे आपणही जातीपातीच्या पलीकडे विचार केला पाहिजे. समाजाच्या उन्नतीसाठी माणूस ज्ञान, विज्ञान, तंत्रज्ञान आणि संशोधन यांचा उपयोग करून पुढे जायला हवा. मी आणि माझी पत्नी बौद्ध धर्माच्या ठिकाणी गेलो होतो. त्या वेळी भगवान गौतम बुद्धांचे दर्शन घेतले आणि बोधी वृक्षाखाली उभा असताना वटवृक्षाचे पान माझ्या खांद्यावर पडले. तेव्हा उपस्थित बौद्ध भिकूंनी सांगितले की हे भगवान बुद्धांचे आशीर्वाद आहेत. अशा प्रसंगातून आपण समाजासाठी केलेल्या कार्याची दखल घेतली जाते, याचा आनंद होतो, असे गडकरी म्हणाले.

आप्पासाहेब गोगटे यांनी कधीच स्वतःचे कटआउट्स लावले नाहीत, प्रसिद्धीसाठी प्रयत्न केले नाहीत. त्यांनी निस्वार्थी भावनेने समाजासाठी कार्य केले. गरिबांसाठी, शोषितांसाठी, बेघरांसाठी, शिक्षण आणि विकासासाठी त्यांचे योगदान मोठे आहे. नितीन गडकरी म्हणाले, आज मी या कार्यक्रमाला आलो याचे कारण म्हणजे आप्पांच्या कार्याचा सन्मान करणे. आप्पांसारख्या अनेक कार्यकर्त्यांच्या परिश्रमातून आजचा पक्ष आणि राज्य उभे राहिले आहे. मंत्रीपद किंवा सत्ता मिळवणे हे खरे यश नाही, तर हजारो कार्यकर्त्यांनी निःस्वार्थ भावनेने काम करणे हेच खरे यश आहे.आप्पांच्या विचारांचे कार्य पुढे नेऊया आप्पांनी संघ आणि जनसंघासाठी मोठे योगदान दिले. त्यांच्या स्मृतींना वंदन करताना आपणही त्यांच्या कार्याचा आदर्श घ्यायला हवा. आज देश समृद्ध, शक्तिशाली, आणि विश्वगुरू बनवण्यासाठी आपल्याला त्यांच्या विचारांप्रमाणे कार्य करावे लागेल.आप्पांसारख्या कार्यकर्त्यांचे स्मरण करत, त्यांच्या विचारांचा आदर्श ठेवून आपण पुढे जाण्याचा संकल्प करूया. त्यांची आत्मा स्वर्गात निश्चितच समाधानी असेल की आपण त्यांचे कार्य पुढे नेत आहोत.

यावेळी व्यासपीठावर महाराष्ट्राचे बंदर विकास व मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे ,माजी आमदार अजित गोगटे, माजी आमदार प्रमोद जठार, शिवसेना जिल्हाप्रमुख अशोक दळवी, प्रकाश गोगटे, माजी आमदार डॉक्टर विनय नातू, राष्ट्रीय वकील संघटनेचे अध्यक्ष ॲड. संग्राम देसाई, भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, श्वेता कोरगावकर, स्नेहलता देशपांडे, काका ओगले, अश्विनी भावे, शामकांत काणेकर, नकुल पार्सेकर, संदीप साटम, बाळ खडपे, सुधीर जोशी, सदा ओगले, वैभव बिडये यांच्यासह आदी मान्यवर उपस्थित होते.