राणेंची बदनामी करणारी वाटली जातायत निनावी पत्रक ; आयोगाकडे करणार तक्रार

विनायक राऊत निष्क्रिय खासदार ; ठाकरेही देत नाही किंमत : दीपक केसरकर
Edited by: विनायक गांवस
Published on: April 21, 2024 11:35 AM
views 256  views

सावंतवाडी : नारायण राणेंना अर्ज भरताना जनतेनं दिलेला उत्स्फूर्त प्रतिसाद बघून विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकू लागली आहे. त्यातूनच निवडणूकीत जे प्रकार करू नयेत ते प्रकार विरोधकांकडून केले जात आहेत. सिंधुदुर्गतील वनसंज्ञे संदर्भात नारायण राणेंची बदनामी करणारी निनावी पत्रक वाटली जात आहेत. त्यावर महाविकास आघाडीच्या नेत्यांचे, उमेदवाराचे फोटो आहेत. या संदर्भात निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार आहे. खासदार विनायक राऊत आपल्या भाषणात हाच खोटा प्रचार करत फिरत आहेत. राऊत हे निष्क्रीय खासदार असून खोटा प्रचार करताना दहा वर्षात तुम्ही काय केलंत ? ते जनतेला सांगा असं आव्हान शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी खा.‌राऊतांना दिलं. तर नारायण राणे एकतर्फी ही निवडणूक जिंकतील व पुन्हा केंद्रात मंत्री होतील असा विश्वास व्यक्त करताना दहा वर्ष खासदार असलेल्या राऊतांना उद्धव ठाकरे सुद्धा किंमत देत नाहीत असा घणाघात केसरकरांनी केला. महायुतीच्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. 

मंत्री केसरकर म्हणाले, पत्रक काढताना प्रकाशकाच नाव, प्रती छापण्याबाबतचा उल्लेख करावा लागतो. तसेच ते निवडणूक आयोगाकडे देऊन परवानगी घेण गरजेचं असतं. अस असताना सिंधुदुर्गतील वनसंज्ञे संदर्भात नारायण राणेंची बदनामी करणारी निनावी पत्रक वाटली जात आहेत. त्यावर महाविकास आघाडीच्या नेत्यांचे, उमेदवाराचे फोटो आहेत. त्यामुळे या संदर्भात निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार असून निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांचही लक्ष वेधणार आहोत. चुकीचं चित्र जनतेसमोर उभ केल जात आहे. खोटी पत्रक वाटली जात आहेत. वनसंज्ञेची अंमलबजावणी करण्याचा निर्णय हा सुप्रिम कोर्टाचा होता. त्या आदेशानुसार भारतात त्याची अंमलबजावणी झाली. प्रत्येक जिल्ह्यात जिल्हाधिकारी यांना प्रतिज्ञापत्रक सादर करण्यास सांगितली होती. त्यानुसार सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सादर झालेल्या ४२ हजार हेक्टर जमीनीला तत्कालीन मंत्री नारायण राणे यांनी तीव्र आक्षेप घेतला होता‌. वनसंज्ञा लावलेल्या जमीनीबाबत चुकीची माहीती जिल्हाधिकारी यांनी दिली अस पत्रिज्ञापत्र दिलं. त्यासाठी विशेष समिती नेमली गेली. या समितीने अठराशे हेक्टर जमीन वगळता उर्वरीत जमीन वनसंज्ञेतून वगळण्यात यावी असं प्रतिज्ञापत्र सुप्रिमकोर्टात दाखल केलं. हा विषय सुप्रिम कोर्टात आहे. कोर्ट हीअरींग घेत नाही तोवर यावर निर्णय होऊ शकत नाही. हे असताना नारायण राणे यांनीच ही वनसंज्ञा लावलेली आहे असा चुकीचा प्रचार केला जात आहे. हा खोटा प्रचार आहे, यावर कारवाई होईलच. परंतू, आपल्या भाषणात खासदार विनायक राऊत हाच प्रचार करत फिरत आहेत. त्यामुळे ही पत्रक त्यांचीच असल्याचा आमचा आरोप आहे. ते दहा वर्ष या मतदारसंघाचे खासदार होते‌. केंद्राशी संबंधित हा प्रश्न असताना ते काय करत होते ? विनायक राऊत हे निष्क्रीय खासदार आहेत. खोटा प्रचार करताना दहा वर्षात काय केलं हा सवाल जनतेन त्यांना विचारला पाहिजे. या जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करणारे खासदार मंत्री झाले आहेत. प्रा. मधू दंडवते, सुरेश प्रभू यांनी ते मंत्रीपद मिळवलं होतं. राज्यसभेचे खासदार असताना देखील नारायण राणेंना केंद्रीय मंत्री पद मिळाल.कोकणचे प्रतिनीधी असल्यानं मानाचं स्थान त्यांना मिळालं. मात्र, विनायक राऊत यांना कुणी ओळखत सुद्धा नाही. साधं राज्यमंत्री त्यांना दहा वर्षांत कुणी केलं नाही. हे सोडा तर उद्धव ठाकरे सुद्धा यांना किंमत देत नाहीत असा घणाघात केसरकरांनी केला. 

नारायण राणे आता केंद्रीय मंत्री आहेत. इथून निवडून आल्यानंतर पुन्हा ते मंत्री होणार आहेत. आमचा खासदार मंत्री होतो हा इतिहास आहे. हे मंत्रीपद कोकणच्या हक्काचं आहे. नारायण राणेंना कोकणचा वाघ म्हणून ओळखले जात. विनायक राऊत यांनी राणेंचा द्वेष करताना कोणत्या पातळीवर जाव याच भान राखावे. आमचा देखील वाद होता. मात्र, तो तात्विक होता. व्यक्तिगत पातळीवर आम्ही जात नाही. राणे हे आक्रमक व विकास करणार व्यक्तिमत्त्व आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याचा कायापालट त्यांनी केला. रस्ते, पाणी, वीज ग्रामिणभागात त्यांनी पोहचवली. ज्या लोकांना सिंधुदुर्गात उतरायची भीती वाटत होती ते आता फुशारक्या मारत आहेत. माझे राणेंसोबत मतभेद होते तेव्हा देखील जिल्ह्याच्या विकासासाठी आम्ही एकत्र होतो असं केसरकर म्हणाले. तर मुंबईतून आदेश सोडून कोकणी जनता झुकणार हे दिवस आता संपले आहेत. अडीच वर्षांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोकणाला काही देऊ शकले नाही. कोकणावर केवळ त्यांनी अन्याय केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्व प्रश्न निकाली काढले‌‌, ठाकरेनी लावलेली स्थगिती उठवली. त्यामुळे कोकणी जनतेन उबाठाचा पराभव केला पाहिजे. केवळ मतांसाठी ठाकरेंना कोकणी माणूस लागतो. त्यामुळे खोटारड्या लोकांसोबत कोकणी जनता आता रहाणार नाही. 

दरम्यान, नारायण राणेंच्या खात्याच्या माध्यमातून साडेपाच लाख कोटी उद्योगाला उपलब्ध करून दिलं. पंतप्रधान, राष्ट्रपतींनी त्यांच कौतुक केल. अशा कोकणी माणसाच्या मागे जनतेन ठामपणे उभं राहिलं पाहिजे असं आवाहन केसरकर यांनी केलं. तर मी व्हॅनमध्ये बसून प्रचार करणार नाही. पंधरा दिवसांत प्रचार करताना ज्या गावात जाणर तिथेच थांबणार आहे. आमच्या गरीब तालुक्यात प्रत्येक गावात हॉटेल्स नाहीत. त्यामुळे केवळ रात्रीची झोप घेण्यापलीकडे व्हॅनिटीचा वापर करणार नाही. पुढील पंधरा दिवस निलेश राणेंच्या वेळी केला तसाच प्रचार नारायण राणेंचा करणार आहे. छोट्या लोकांनी कोणत्याही गोष्टीवर टीका करू नये असा टोला त्यांनी शिवसेना ठाकरे गटाला हाणला. तर गावागावात, वाडीवस्तीत जाऊन नारायण राणेंच्या मागे मोठं मताधिक्य उभं करणारं आहे. विविध योजनांच्या माध्यमातून जिल्ह्याच दरडोई उत्पन्न दुप्पट करण्यावर आमचा भर आहे. तसेच जर्मन शिष्टमंडळ जिल्ह्यात असून चार लाख मुलांना नोकरी देण्याचा मानस आहे. इतिहासात पहिल्यांदाच दोन राज्यांत असा करार झाला आहे. आपल्या मुलांसाठी जर्मनीत स्वागत कक्ष उभारले आहेत. दोडामार्गमध्ये मोठे उद्योग येत आहेत. राणेंच्या पुढाकारान ते होत आहे. आम्ही दिवसरात्र काम करतो. विरोधक फक्त टीका करतात. जिल्ह्याला चांगले दिवस येत असताना राणे ही निवडणूक एकतर्फी जिंकतील असा विश्वास शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी व्यक्त केला. याप्रसंगी माजी आमदार राजन तेली, माजी नगराध्यक्ष संजू परब, शिवसेना जिल्हाप्रमुख अशोक दळवी, राष्ट्रवादीचे उदय भोसले, सत्यजित धारणकर, अशोक पवार, अजय गोंदावळे, गणेशप्रसाद गवस, अमित परब, विनायक दळवी, बंटी पुरोहित आदी महायुतीचे पदाधिकारी उपस्थित होते.