
सावंतवाडी : ब्रिटिश कालीन आंबोली घाट बांधकाम विभागाच्या चुका व दुर्लक्षामुळे अंतिम घटका मोजू लागला आहे. घाटातील ब्रिटिशकालीन पूल आता जीर्ण झाली आहेत. बांधकाम विभागाच्या अनियोजित कारभारामुळे येथील रस्ते वाहून जात आहेत.
आंबोली घाट धोक्यात ?
ब्रिटिश कालीन गटार न खोदणे, रस्त्याचे गटार न खोदणे, अडू बांध न बांधणे, खाजगी मोबाईल टॉवर कंपन्यांना वाटेल तशा केबल घालू देणे, संरक्षक कठडे सुस्थितीत न करणे यासारख्या अनेक चुकांमुळे आंबोली घाट धोक्यात आला आहे. मैलकुल नेमले नसल्याने जुने नाले साफ होत नाही आहेत. दहा वर्षांपूर्वीचा घाट व आताचा घाट यात फरक आहे असं स्थानिकांच मत आहे. गेल्या दहा वर्षात आंबोली घाटाकडे बांधकाम विभागाने दुर्लक्ष केलं आहे. आंबोली घाटातील 40 फुटाची मोरी या ठिकाणी काही दिवसापूर्वी एक भला मोठा दगड कोसळला होता. हा दगड कोसळल्यामुळे या पुलावर खड्डा पडला. पुलावर खड्डा पडल्यामुळे या ब्रिटिशकालीन पुलाला मोठा धोका पोहोचण्याची शक्यता निर्माण झाली आहे. हा खड्डा बुजवण्याची गरज होती. जेणेकरून या ब्रिटिशकालीन पुलाच्या खालील भागात एकमेकात अडकवलेल्या दगडांमध्ये पाणी न जाता ते सुरक्षित राहील. परंतु, या ठिकाणी पडलेला हा खड्डा केवळ चिरे आणि मातीने मुजविण्यात येत आहे. ज्यामुळे या खड्ड्यातून पाणी खाली झिरपून या पुलाला धोका पोहोचण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.
मंत्री केसरकरांचं वेधलं लक्ष !
याबाबत मंत्री दीपक केसरकर यांना स्थानिकांनी कळविले असून उपाययोजना करण्यासाठी विनंती केली. परंतु बांधकाम विभाग मात्र याकडूशे गांभीर्याने घेत नसल्याच्या दिसून येत आहे. याबाबत स्थानिक पर्यटन व्यवसायिकांमध्ये तीव्र संताप असून तात्काळ या ठिकाणी पेवर ब्लॉकस व सिमेंटच्या माध्यमातून खड्डे बुजविण्यात आले पाहिजे अशी मागणी होत आहे. जेणेकरून ते पाणी पुलाच्या खालील बांधकामास धोका पोहोचू शकणार नाही. तात्पुरती मलमपट्टी ही लगेच उघडत असल्यामुळे खड्डा मोठा होत आहे. ज्यामुळे हे पूल कोसळण्याची शक्यता निर्माण होऊ शकते. हे जर पूल कोसळले तर आंबोलीच्या पर्यटनावरती मोठे संकट येणार आहे. याशिवाय गोवा, कर्नाटक, कोल्हापूर हा व्यापारी मार्ग ठप्प होणार आहे. ज्यामुळे करोडो रुपयांचे नुकसान होणार आहे. सद्यस्थितीत आंबोली घाटातील गटारे सुस्थितीत करणे गरजेचे आहे. तर खाजगी मोबाईल कंपन्यांनी दरीमध्ये जाणाऱ्या पाण्याच्या मार्गामध्ये बांधलेले काँक्रीटचे बंधारे फोडून ते पाणी दरीमध्ये जाण्यास मोकळे करणे गरजेचे आहे अशी मागणी होत आहे.