
सावंतवाडी : नागरिकांसह अपघातग्रस्तांच्या नातेवाईकांनी घेतलेल्या आक्रमक पावित्र्यातनंतर अखेर प्रशासन वठणीवर आलं आहे. शहरातील रस्त्यांवर असलेली अपघातांना आमंत्रण देणारी खडी बाजूला करण्यास त्यांनी सुरुवात केली आहे. त्यामुळे अपघतांच्या मालिकेला ब्रेक लागणार असून नागरिकांनी सुटकेचा निःश्वास सोडला आहे.
शहरात गेल्या दोन दिवसांत तब्बल नऊ अपघात झाले होते. याला ठेकेदाराच्या चुकीमुळे नादुरुस्त झालेले रस्ते पुन्हा दुरूस्ती करणे कारणीभूत ठरले होते. रस्त्यावरील ग्रीटमुळे दुचाकी घसरून होणारे अपघात व जखमींची संख्या वाढत होती. यामुळे संतप्त झालेल्या नागरिकांसह जखमींच्या नातेवाईकांनी पोलीस ठाणं गाठत प्रशासकांसह ठेकेदारावर मनुष्य हानीचे गुन्हे दाखल करण्याची मागणी केली. यानंतर लागलीचच प्रशासनाकडून रस्त्यावरील ही अपघातास आमंत्रण देणारी खडी हटवण्यास सुरूवात झाली आहे. यामुळे शहरवासीयांनी सुटकेचा निःश्वास सोडला आहे. याबाबत स्थानिक आमदार दीपक केसरकर यांचेही लक्ष अपघातग्रस्तांच्या नातेवाईकांनी वेधल होत.
दरम्यान, शहरातील सर्व भागात ही मोहीम न.प. प्रशासनानं राबवून ती खडी बाजूला करावी. नव्या गतिरोधकांवर पट्टे मारावे व निर्देशक फलक बसवावे. यासाठी सामाजिक बांधिलकी मदतीचा हात पुढे करण्यास सज्ज असून या अभियानात सहभागी होईल अशी माहिती सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानचे रवी जाधव यांनी दिली.