कणकवली : तळेरे करुळ घाटमार्ग रस्त्याची डागडुजी अद्यापही झाली नाही. फोंडाघाट रस्त्याची अवस्था बिकट आहे, त्याला जबाबदार कोण? पर्यटक येत नसल्याने व्यापारी अडचणीत आहे. गाड्या वेळेत नाही. आताच एक व्यापारी अपघातात गेला? त्याला लहान मुले आहेत, त्याला जबाबदार कोण? अशी विचारणा व्यापारी महासंघाचे जिल्हा कार्यवाह नंदन वेगुर्लेकर यांनी कार्यकारी अभियंता अजयकुमार सर्वगोड यांना केली. त्यावर कार्यकारी अभियंत्यांनी येत्या १५ दिवसांत खड्डे बुजवले जातील. मी माझ्या कामाविषयी गंभीर आहे, असे आश्वासन व्यापारी महासंघाला दिली आहे.
यावेळी व्यापारी संघटना जिल्हा कार्यवाह नंदन वेंगुर्लेकर, कणकवली तालुका अध्यक्ष दीपक बेलवलकर, राजू पावसकर, महेश नार्वेकर, निवृत्ती धडाम, नांदगाव व्यापारी संघटना अध्यक्ष गुरुप्रसाद वायंगणकर, उपाध्यक्ष मारुती मोरये, असलदे सोसायटीचेअरमन भगवान लोके, भाई मोरजकर, कमलेश पाटील, फोंडाघाट अध्यक्ष यशवंत मसुरकर, नागेश कोरगांवकर, सिद्धेश पावसकर, गुणेश कोरगांवकर, संदीप पारकर, रंजन चिके, तळेरे व्यापारी संघटना अध्यक्ष राजू जठार आदीसह पदाधिकारी उपस्थित होते.
फोंडाघाट लगतच्या बाजारपेठा आहेत, ते सर्व रस्ते व्यवस्थित झालेच पाहिजेत. पावसाचे पाणी रस्त्यावर येत आहे, देवगड निपाणी रस्ता हा राज्यमार्ग आपल्या विभागाअंतर्गत येतो, नांदगाव ते दाजीपूर खिंड तसेच असलदे रोड ते असलदे पिरापर्यंत रस्त्याची दुर्दशा झाली आहे. रस्त्याला गटार व्यवस्था नसल्यामुळे पावसाचे पाणी रस्त्यावर येवून खड्डे पडत आहेत. तसेच रस्त्याच्या दुतर्फा झाडी वाढत असल्याने ही समस्या निर्माण होत आहे. प्रत्येक वर्षी या मार्गावर रस्त्याच्या खड्ड्यामुळे मनुष्य बळी घेतले जात आहेत. परंतु सार्वजनिक बांधकाम विभाग याबाबत गंभीर नाही. अजून किती लोकांचे बळी घेणार? अशी विचारणा असलदे सरपंच पंढरी वायगणकर यांनी केली.
यंदाच्या पावसाळ्यात या रस्त्यावर चालत जाणे येणे हे मुश्किल झाले आहे. तसेच या रस्त्यारस्त्यावर वाहन चालवणे ही जीवघेणी कसरत वाहन चालकांना करावी लागत आहे. वारंवार रस्ता दुरुस्ती बाबत मागणी आणि आंदोलन होऊनही या मार्गाच्या दुरुस्तीबाबत आपला विभाग जाणून बुजून दुर्लक्ष करीत आहे. आठ दिवसापूर्वी तर मोटरसायकल स्वाराचा मार्गातील खड्ड्यामुळे बळी गेला आहे. एवढे भयानक खड्डे पडले असूनही आपला विभाग जुजबी कारभार करून कंत्राटदाराची पाठराखण करत आहे. रस्त्याच्या खड्डेमय दुरावस्थेमुळे व्यापारी व इतर खाजगी वाहनांची देखील डागडुजी खर्चात भरमसाठ वाढ झाली आहे. पण वाहतुकीचे प्रमाण कमी झाल्यामुळे त्याचा परिणाम विपरीत व्यापारावरही होत असल्याचे निवेदन नांदगाव व्यापारी संघटनेने दिले आहे.
तळेरे करुळ घाटमार्ग रस्त्याची डागडुजी करण्यासाठी एक दिवस काम चालू केलं,आणि दुसऱ्या दिवशी बंद झालं. आता त्या ठेकेदाराला रस्ता दुरुस्तीसाठी खडी नाही. त्यामुळे व्यापारी काय करणार? अशी विचारणा राजू जठार यांनी केली.
दरम्यान, कामे करण्यात येतील, काही अडचणी असतात. मी काम करणारा अधिकारी आहे. आपण सहकार्य करावे, असे आवाहन श्री.सर्वगोड यांनी केले. तसेच व्यापारी, ठेकेदार आणि आमचे अधिकारी आजच संयुक्त पाहणी करतील, असे आश्वासन त्यांनी दिले.
गुणवत्ता नियंत्रण प्रयोग शाळा जिल्ह्यात असावी, त्यामुळे नागरिकांना त्याचा उपयोग होईल. एखादा ठेकेदार काम करत असेल तर त्याविरुद्ध आवाज उठवणे सोपं होईल, अशी मागणी नंदन वेंगुर्लेकर यांनी महासंघाच्यावतीने केली.
यावेळी कार्यकारी अभियंता अजयकुमार सर्वगोड यांनी केवळ रस्ता बनवणे हे माझे काम नाही तर दरडोई उत्पन्न वाढवणे, ही देखील माझी जबाबदारी असल्याचे सांगितले. मी ज्या भागात काम केले तिथे दहा वर्षे रस्त्याला काही झाले नाही. मी कर्जतमध्ये चांगले काम केलं. त्या ठिकाणी रस्ते केले, त्यामुळे तिथे विकास झाला. मोठे पर्यटन वाढले आहे. एक प्रकारे त्या ठिकाणी दरडोई उत्पन्नात वाढ झाली. त्याच पद्धतीने या ठिकाणी चांगले काम केलं जाईल, अशी ग्वाही कार्यकारी अभियंता अजयकुमार सर्वगोड यांनी दिली.