दोडामार्ग : तिलारी घाट उतरत असताना जयकर पाॅईंट येथील तीव्र उताराच्या वळणाचा अंदाज न आल्याने मालवाहू ट्रक पलटी झाल्याची घटना शुक्रवारी रात्री ११ वा.च्या सुमारास घडली. सुदैवाने चालक व वाहक सुखरूप असून ट्रकचे मात्र मोठे नुकसान झाले आहे.
तिलारी घाटात वाहनांची वर्दळ वाढली आहे. या घाटातील रस्ता वाहतुकीस सुरळीत असला तरी या घाटातून प्रथमच प्रवास करणाऱ्या वाहनचालकांसाठी तितकाच धोकादायक असल्याचे चित्र समोर येत आहे. शिवाय घाटातील तीव्र स्वरुपाचे उतार व यु वळणामुळे चालकांचे अंदाज चुकल्याने वारंवार अपघातांचे प्रमाणही वाढत आहे. शनिवारी सकाळी एक मालवाहू ट्रक चंदगडहून तिलारी घाट मार्गे गोव्याला जात होता. घाट उतरत असताना जयकर पाॅईंट येथील तीव्र स्वरुपाच्या उताराचा अंदाज न आल्याने चालकाचे ट्रकवरील नियंत्रण सुटले व तेथील यु वळणावरील तुटलेल्या संरक्षक कठड्याला ट्रकची जोरदार धडक बसली. धडक इतकी जबर होती की ट्रक जाग्यावरच पलटी झाला. सुदैवाने तो खोल दरीत कोसळण्यापासून बचावला. या अपघातात ट्रकच्या दर्शनी भागाचे मोठे नुकसान झाले आहे.