
वेंगुर्ले : वेंगुर्ले तालुक्यात उंच सखल भाग असल्यामुळे एसटी गाड्या चढायला अडचण होते त्यामुळे डिझेलच्या एसटी गाड्या वेंगुर्ले डेपोला द्या अशी मागणी येथील एसटी कर्मचारी संघटनेने केली होती. त्याप्रमाणे ५ डिझेल एसटी गाड्या डेपोला दिलेल्या आहेत. अजून ५ गाड्यांची येथील आगार व्यवस्थापकांनी मागणी आहे. याबाबत मंत्री सरनाईक यांना भेटून ती मागणी सुद्धा पूर्ण केली जाईल. अत्याधुनिक एसटी डेपो तयार करण्याचे निर्देश आहेत. लवकरच याबाबतची बैठक मुंबईत होईल अशी प्रतिक्रिया आमदार दीपक केसरकर यांनी वेंगुर्ले येथे दिली.
वेंगुर्ले एस टी आगाराला नवीन ५ एस टी गाड्या मंगळवारी १० जून रोजी प्राप्त झाल्या. या गाड्यांचे आज गुरुवारी (१२ जून) आमदार दिपक केसरकर यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून व फीत कापून लोकार्पण करण्यात आले. यावेळी सर्वप्रथम या ५ एसटी बस वेंगुर्ले आगाराला मिळण्यासाठी प्रयत्न केल्याबद्दल आमदार दीपक केसरकर यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन शिवसेनेच्या राष्ट्रीय कर्मचारी सेना या वेंगुर्ले एसटी संघटनेच्या वतीने सत्कार करण्यात आला.
यावेळी एसटी आगार व्यवस्थापक राहुल कुंभार, शिवसेना पुरस्कृत राष्ट्रीय कर्मचारी सेनेचे वेंगुर्ले तालुकाध्यक्ष सुनील डुबळे, शिवसेना तालुकाप्रमुख नितीन मांजरेकर, शहरप्रमुख उमेश येरम, भाजप तालुकाध्यक्ष पप्पू परब, माजी नगराध्यक्ष दिलीप गिरप, माजी नगरसेवक सुहास गवंडळकर, माजी जि प सदस्य दादा कुबल, मच्छिमार नेते वसंत तांडेल, दादा केळुसकर, शिवसेना उपजिल्हाप्रमुख सुनील मोरजकर, युवासेना जिल्हाप्रमुख हर्षद डेरे, तालुकाप्रमुख स्वप्नील गावडे, महिला तालुका संघटिका दिशा शेटकर, शहर संघटिका ऍड श्रद्धा बाविस्कर- परब, शाबाना शेख, मनाली परब, भाजपचे सायमन आल्मेडा, मनवेल फर्नांडिस, युवमोर्चा तालुकाध्यक्ष प्रणव वायंगणकर, शिवसेना कोस्टल विभाग तालुकाप्रमुख काशिनाथ नार्वेकर, उपतालुकाप्रमुख कौशिक परब, तालुका संघटक बाळा दळवी, विभागप्रमुख अमित गावडे, संजय परब, उपविभागप्रमुख संजय गावडे, सत्यवान साटेलकर, राजू परब यांच्यासहित महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते एसटी अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.
उबाठा शिवसेनेवर टोला
यावेळी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वतीने मंगळवारी या एसटी लोकार्पण कार्यक्रम करण्यात आले होता. यावर बोलताना आमदार केसरकर यांनी मी मंजूर केलेल्या कामांची नारळ फोडायची काहींना सवय आहे असा टोला उबाठा शिवसेनेवर लगावला. यावेळी बोलताना ते म्हणाले ज्यांच्या हातात सत्ता नाही त्यांनी अशी नाटक करण्यात काही अर्थ नाही. उबाठाची एकंदरीत शिस्त बिघडली आहे असे दिसते. शिवसेना आणि भाजप या दोन्ही पक्षाच्या संघटना एसटी मध्ये आहेत. कर्मचाऱ्यांना न्याय देण्याची त्यांची भूमिका असल्याचेही ते म्हणाले.