
सावंतवाडी : नगरपरिषदेच्या कामकाजावरून सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील संघर्ष आता अधिक तीव्र होताना दिसत आहे. विरोधी पक्षाने विचारलेल्या प्रश्नांची समाधानकारक आणि समर्पक उत्तरे नगराध्यक्षा देत नाहीत, असा थेट आरोप शिवसेना नगरसेविका ॲड. निता सावंत-कविटकर यांनी केला आहे. प्रसिद्धी पत्रकाद्वारे त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. आपला आवाज दबला जाणार नाही असं मत त्यांनी व्यक्त केल आहे.
ॲड. निता सावंत यांनी म्हटले आहे की, नगरपरिषदेच्या सभेत जेव्हा जनहिताचे किंवा प्रशासकीय त्रुटींबाबत प्रश्न विचारले जातात, तेव्हा नगराध्यक्षांकडे त्यांची योग्य उत्तरे नसतात. प्रश्नांची उत्तरे देण्याऐवजी केवळ वेळ मारून नेण्याचा प्रयत्न होतो. मोठ्या आवाजात बोलू नका अशा सूचना दिल्या जातात. मात्र, नगराध्यक्षांनी विरोधी पक्षाचा आवाज दाबण्याचा प्रयत्न मुळीच करू नये. आमचा आवाजच मुळात मोठा आहे आणि तो जनतेच्या अन्यायाविरोधात असाच उठत राहील. आमचा आवाज दाबण्यापेक्षा तो ऐकून घेण्याची तयारी ठेवावी असे आव्हानही त्यांनी दिले.










