
सावंतवाडी : नैसर्गिक नाला नसताना सुद्धा रस्त्याच्या रचने नुसार काम न झाल्याने रस्त्यावरील पाणी साचून ते शेतजमिनीत जाऊन जमिन नापीक होत असल्याने अधिकृत नाल्याला गटाराने पाणी सोडून पाण्याचा निचरा करावा अशी मागणी करत कुडाळ तालुक्यातील सुषमा पाटकर यांनी सार्वजनिक बांधकाम कार्यालयासमोर बेमुदत उपोषण छेडले. सार्वजनिक बांधकामचे अधिकारी माहिती अधिकारात अर्ज करुनही दखल घेत नसल्याचे व माहिती देत नसल्याचा आरोप त्यांनी केला.
सावंतवाडी येथील कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यालयासमोर वयोवृद्ध महिला सौ. पाटकर व सचिन पाटकर यांनी उपोषण छेडले. रेडी रेवस सागरी महामार्गावर माड पोफळी शेतीमध्ये रस्त्याची संरचने प्रमाणे न झाल्याने रस्त्यात पाणी साचून ते आमच्या शेतीत सोडल्याने बहुतांशी शेतजमिन नापीक झाली आहे. तहसीलदार कुडाळ यांच्या पंचयादीनुसार दरम्यान शेतजमीन नापीक बनली असून ३ माड, ६ पोफळी उन्मळून पडल्याबाबत पंचयादीत नोंद आहे. असेच नुकसान दरवर्षी होत आहे. रस्त्याची रचनेनुसार सपाटीकरण न झाल्यामुळे पावसाचे पाणी रस्त्यावर साचून अपघातजन्य परिस्थिती उद्भवत आहे. रस्त्याच्या शेतीसमोरील पाण्याचा निचरा होण्यासंदर्भात ग्रामपंचायत परबवाडा पाट कार्यालयसमोर सुरू केलेले बेमुदत उपोषण यापूर्वी पत्र मिळाल्यानंतर स्थगित केले होते. मात्र, त्यानंतर लेखी आश्वासानुसार अद्याप कोणतीही कार्यवाही झालेली नसल्याने त्यांनी उपोषणाचा मार्ग अवलंबला.










