
सावंतवाडी : महिला कायद्याचा गैरवापर करत ग्रामपंचायत रस्ता अडवणाऱ्या व उपद्रवी वर्तन करणाऱ्या महिलेवर व तिच्या पतीवर तात्काळ कारवाई करून गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी करत आंबोली मुळवंदवाडी येथील महिलांनी १ मे रोजी प्रांताधिकारी कार्यालयासमोर उपोषण छेडले.
यावेळी प्रशासनाकडून कार्यवाहीचे आश्वासन देण्यात आल्याने उपोषण तूर्त स्थगित करण्यात आले असून १५ दिवसांत कार्यवाही न झाल्यास पुन्हा उपोषण छेडण्याचा इशारा महिलांकडून देण्यात आला आहे. यावेळी शेतात जाण्या- येण्याचा ग्रामपंचायत रस्ता तात्काळ मोकळा करावा, मुलांच्या खेळाच्या मैदानावरील शासकीय जमीनीवरील अतिक्रमण दूर करावे, विना चौकशी आजी, माजी सैनिक व ग्रामस्थांसह अल्पवयीन मुलांवर दाखल केलेले गुन्हे मागे घ्यावेत अशी मागणी महिलांनी प्रशासनाकडे केली आहे.यावेळी जयश्री गावडे, दिपाली गावडे, वनिता गावडे, लक्ष्मी गुरव, नम्रता गुरव, सत्यवती गावडे, प्रभावती गावडे आदींसह आंबोली मुळवंदवाडीतील शेकडो महिला उपस्थित होत्या.










