घोटगे ग्रामस्थ व ग्रामपंचायतचे उपोषण लेखी आश्वासनानंतर मागे

Edited by: लवू परब
Published on: May 02, 2026 09:14 AM
views 3  views

दोडामार्ग : घोटगे ग्रामस्थ व ग्रामपंचायतीने 1 मे महाराष्ट्र दिनी आपल्या पाच मागण्यासाठी ग्रामपंचायत कार्यालय घोटगे येथे  सुरू केलेले उपोषण सिंधुदुर्ग पाटबंधारे प्रकल्प बांधकाम विभागाचे कार्यकारी अधिकारी विनायक जाधव यांनी दिलेल्या लेखी आश्वासनानंतर उपोषण तात्काळ मागे घेण्यात आले. 

           घोटगे गावच्या सरपंचा सौ.भक्ती भरत दळवी, उपसरपंच श्री विजय प्रकाश दळवी, ग्रामस्थ विनय भगवान दळवी, सदस्या सौ.समीक्षा सतीश दळवी, सदस्य अजय वासुदेव दळवी यांनी ग्रामपंचायत कार्यालय घोटगे येथे उपोषण सुरू केले होते.

         उपोषणकर्त्यांनी आपल्या पुढील 5  मागण्या पूर्ण झाल्याशिवाय आम्ही आमचे उपोषण मागे घेणार नाही असा इशारा  दिला होता.

1)तिलारी आंतरराज्य पाटबंधारे प्रकल्पाचा कालवा घोडगेवाडी घोटगे परमे कुडाचे सासोली मार्गे गोव्याच्या दिशेने जातो या कालव्याचे तसेच पाईपलाईनचे मजबुतीकरण करणे.

2) नळ योजना विहिरीच्या बाजूने संरक्षण भिंत बांधणे. 

3) घोटगे वरचीवाडी येथे कालव्यावर रेलिंग बसविणे. 

4) घोटगे गावातील शेतीमध्ये जाण्यासाठी कालव्याच्या बाजूने रस्ता करणे. 

5) कालव्यावरून खाली उतरण्यासाठी ठिकठिकाणी पायऱ्या बांधणे. 

       या पाच मागण्यासाठी ग्रामपंचायत कार्यालय घोटगे या ठिकाणी उपोषण सुरू केले होते. 1  मे रोजी सकाळी दहा वाजता सिंधुदुर्ग पाटबंधारे प्रकल्प बांधकाम विभागाचे कार्यकारी अधिकारी श्री विनायक जाधव ,अभियंता श्री मेहेत्रे , उप अभियंता श्री गुजर, यांनी उपोषण स्थळी भेट दिली. उपोषणकर्त्यांनी केलेल्या मागण्यांची पाहणी घटनास्थळी जाऊन श्री जाधव यांनी केली. सर्व मागण्या पूर्ण करण्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर उपोषण मागे घेण्यात आले.