आंबोली घाटात वाहन चालकांची तपासणी करावी

वाढत्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर सरपंच सागर ढोकरे यांची मागणी
Edited by: विनायक गांवस
Published on: April 15, 2026 14:22 PM
views 24  views

सावंतवाडी : मद्यधुंद अवस्थेत आंबोली घाटातून येणाऱ्या वाहन चालकांकडून अपघातांचे प्रमाण वाढले आहे. दोन दिवसापूर्वी झालेल्या अपघातात एका चिमुकलीचे निधन झाले असून घाटातून ये-जा करणाऱ्या वाहन चालकांची तपासणी करून नंतरच त्यांना पुढे जाऊ द्यावे, अशी मागणी गेळे सरपंच सागर ढोकरे यांनी केली आहे.

काही दिवसांनी वर्षा पर्यटन सुरू होणार आहे. त्यामुळे याबाबत कायमस्वरूपी योग्य ते नियोजन पोलिसांनी करावे, अशी मागणी त्यांनी केली आहे. नुकत्याच झालेल्या अपघाताच्या पार्श्वभूमीवर त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. घाटातील रस्ते अरुंद आहेत. परवानगी नसताना सुध्दा अवजड वाहतूक केली जाते. त्याचबरोबर वाहनधारक भरधाव वेगाने ये-जा करत असतात. त्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढले असून पावसात तर हे प्रमाण मोठे असते. त्यामुळे सर्व घटना लक्षात घेता पोलिसांनी तात्काळ याची दखल घ्यावी आणि संबंधित चालकाची तपासणी करावी. मद्यधुंद अवस्थेत गाड्या चालवताना आढळून आल्यास त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.