
सावंतवाडी : मळगाव घाट मार्गावरील रस्त्यावर पावसाळ्यात पाणी येऊ नये म्हणून सार्वजनिक बांधकाम विभागाने घाट मार्गावरील ' गटारातील माती काढून गटार मोकळे करण्याचे काम सुरू केले आहे. मळगाव घाट रस्त्यानजिकच्या साईड पट्टीचे काम सुरू असताना गटारामध्ये माती पडून गटाराचा मार्ग बंद झाला होता. त्यामुळे पावसाळ्यात गटारे तुंबून गटारातील पाणी रस्त्यावर येवून अपघात होण्याची शक्यता निर्माण होवू शकते. त्यावर उपाय योजना म्हणून सार्वजनिक बांधकाम विभागाने जेसीबीच्या माध्यमातून पावसाळ्यापूर्वी गटारे साफ करण्याचे काम हाती घेतले आहे. मळगांव घाट मार्गातील गटारे मोकळी झाल्याने पावसाळ्यात डोंगराळ भागातून येणारे पाणी गटारातून वाहणार आहे. त्यामुळे रस्त्याची झिज होणार नाही. तसेच वाहन चालकानाही पावसाळ्यात गटारातील पाण्याचा अडथळा होवून अपघात टाळता येणार असल्याने समाधान व्यक्त केल जात आहे.










